इंदुरीकर महाराज जीवनकथा ।। Indurikar Maharaj Biography Marathi
आज आपण महाराष्ट्रातील एक समाज प्रबोधनकार, कीर्तनकार आणि वारकरी संप्रदायातील एक व्यक्तिमत्व ह भ प निवृत्ती महाराज देशमुख म्हणजेच इंदोरीकर महाराज यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
वारकरी संप्रदायातील एक विख्यात प्रबोधनकार म्हणून महाराजांना ओळख निर्माण झालेली आहे. आज आपण त्यांची यशोगाथा आणि त्यांचा बी एस्सी बी एड ते इंदुरीकर महाराज हा प्रवास बघणार आहोत.
वारकरी संप्रदायात कीर्तनाला आपल्याला तरुण पिढी जास्त बघायला मिळत नसते मात्र जेव्हा इंदुरीकर महाराजांचे कीर्तन असते तेव्हा मात्र असंख्य तरुणाई कीर्तनाला आलेली बघायला मिळते. इंदुरीकर महाराज हे व्यक्तिमत्व त्यांच्या कीर्तन शैलीने संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. आपण सोशल मीडिया वापरत असाल तर लोकप्रिय व्यक्तींमध्ये इंदुरीकर महाराजांचा समावेश असतोच.
इंदोरीकर महाराज बायोग्राफी मराठी ।। Nivrutti maharaj Deshmukh Information Biography Marathi
इंदुरीकर महाराजांचा जन्म: 9 जानेवारी 1972
खरे नाव: निवृत्ती महाराज देशमुख
मूळ गाव: इंदोरी, अकोले, अहमदनगर
पत्नीचे नाव: शालिनीताई देशमुख
शिक्षण: बी एस्सी बी एड
हरी भक्त परायन निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदुरी या गावी झाला. इंदुरी गावातील निवासी असल्याने लोक त्यांना इंदुरीकर महाराज असे संबोधू लागले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात महाराजांना इंदुरीकर महाराज म्हणूनच ओळखले जाते. महाराज सध्या अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात असलेल्या उंबरी - ओझर या गावी राहतात. महाराजांचे शिक्षण अहमदनगर जिल्ह्यातच झाले. आई आणि वडील दोघेही वारकरी संप्रदायाचे असल्याने महाराज देखील आई वडिलांसोबत कीर्तनाला जात असत. हळूहळू त्यांच्यामध्ये देखील कीर्तनाविषयी आवड निर्माण झाली. ते शालेय शिक्षण सुरू असताना वारकरी संप्रदायाचे देखील शिक्षण घेत होते. त्यांनी दहावी नंतर विज्ञान शाखा निवडून पदवीचे शिक्षण देखील भौतिकशास्त्र विषयात घेतले. पदवी शिक्षण घेत असताना वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी प्रबोधन करायला देखील सुरुवात केली होती. छोट्या ठिकाणी जाऊन ते कीर्तन करत असत. बी एस्सी झाल्यानंतर त्यांनी बी एड डिग्री घेतली. त्यानंतर त्यांना एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरी देखील मिळाली.
त्या काळात त्यांना सर्व जण प्रोफेसर म्हणायचे. त्यांची नोकरी देखील सुरळीत चालू होती. त्यांची कीर्तनात असलेली आवड त्यांना त्या क्षेत्राला देखील सोडू देत नव्हती. समाजात अनेक रूढी परंपरा आहेत आणि त्यांच्यातील वाईट रूढी त्यांना नेहमी खटकत असत. त्यामुळे त्यांनी प्राध्यापकी सोडून पूर्णवेळ कीर्तन करण्याचा निर्णत घेतला.
हळूहळू महाराजांच्या शैलीने लोक आकर्षित होत होते. इंदुरीकर महाराज हे नाव आता अहमदनगर जिल्ह्यातील लोकांसाठी प्रसिद्ध होत होते. वारकरी संप्रदायातील अभंग आणि त्यातील ओळी समजून सांगताना ते लोकांना सध्याच्या परिस्थितीचे दाखले द्यायचे. ते खोचक आणि स्पष्ट बोलायचे म्हणून त्यांना अनेक लोकांनी विरोध देखील केला. या विरोधाने त्यांनी कीर्तन करायचे थांबविले नाही किंवा कीर्तन करण्याची शैली देखील बदलली नाही.
लोकांना मात्र महाराजांच्या किर्तनाने भुरळ घातलेली होती. लोकांना कीर्तनातून सांगितलेले सध्याच्या परिस्थितीत सुरू असलेले उदाहरण पटत असत. त्यांच्या विनोदी शैलीत कीर्तनाला लोक डोक्यावर घेऊन सध्या मिरवत आहेत.
महाराजांच्या कीर्तनाची संख्या पुढे वाढू लागल्या. सध्या जवळपास पुढील दीड वर्षाच्या कीर्तनाच्या तारखा या महाराजांकडे बुक आहे. म्हणजे तुम्हाला जर इंदुरीकर महाराजांचे कीर्तन ठेवायचे असेल तर कमीत कमी दीड वर्ष तुम्हाला वाट बघावी लागेल.
महाराजांच्या पत्नी ह भ प शालिनीताई देशमुख या देखील कीर्तनकार आहेत. शालिनीताई देखील उच्चशिक्षित आहे. त्यांच्या कीर्तनाला देखील भाविकांची गर्दी असते. महाराजांना दोन मुले आहेत. मुलीचे नाव ज्ञानेश्वरी तर मुलाचे नाव कृष्णा आहे. हे दोघेही वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेत आहेत.
इंदुरीकर महाराज महिन्यातून 80 हुन अधिक कीर्तने करतात. त्यांच्या प्रत्येक कीर्तनाला लोकांची प्रचंड गर्दी असते.
इतकी सर्व प्रसिद्ध आणि लोकप्रियता असून देखील महाराज अगदी साधे जीवन जगतात. त्यांच्याकडे मोबाईल सुद्धा नोकिया कंपनीचा जुना बटनाचा आहे. महाराजांना मानधन देखील मोठ्या प्रमाणात भेटते मात्र त्याचा वापर ते लोककल्याणासाठी करतात. संगमनेर तालुक्यात त्यांची स्वतःची एक शाळा आहे. ज्ञानेश्वर माऊली बहुउद्देशीय सेवाभावी संस्था या अंतर्गत त्यांचे सामाजिक कार्य चालते. या शाळेतील मुलांना शिक्षण मोफत आहे. विद्यार्थांचा वर्षाचा खर्च हा फक्त 250 रुपये आहे. मोफत मिळतंय म्हणून शाळेत सुविधा नसतील असे नाही. एखाद्या खाजगी इंग्लिश शाळेला देखील लाजवेल अशी ही शाळा आहे.
कीर्तनाच्या माध्यमातून महाराजांनी सर्व काही बदलले आहे. आज अनेक गावे दारूमुक्त झाली आहेत, अनेक गावांतील रात्रीच्या वराती बंद झाल्या आहेत, आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकणारी मुले आई वडिलांचा सांभाळ करू लागलीत. महाराजांच्या कीर्तनाचा हे जर भेटत असेल तर महाराजांचे कार्य सफल झाले हे आपण ठामपणे बोलू शकतो.