ठाणे जिल्ह्याची माहिती || Thane District information in Marathi
महाराष्ट्र राज्याच्या कोकण विभागातील औद्योगिक दृष्ट्या प्रगतीपथावर असलेला एक महत्वाचा जिल्हा म्हणजे ठाणे जिल्हा! आज याच ठाणे जिल्ह्याविषयी आपण संपूर्ण आणि सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
ठाणे जिल्ह्याची भौगोलिक माहिती - Geographical Information of Thane District
ठाणे जिल्हा हा लोकसंख्याच्या दृष्टीने 2011 साली झालेल्या जनगणनेच्या अनुसार महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे. ठाणे जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ हे 4214 चौ की मी आहे. ठाणे जिल्ह्यात एकूण 7 तालुके आहेत. कल्याण, मुरबाड, उल्हासनगर, अंबरनाथ, भिवंडी, शहापूर आणि ठाणे ही त्या जिल्ह्यांची नावे आहेत.
ठाणे जिल्ह्याच्या पूर्वेकडे सह्याद्री पर्वताच्या रांगा तर पश्चिमेस अरबी समुद्र आहे.महाराष्ट्र राज्याला लाभलेल्या 720 किलोमीटर समुद्रकिनाऱ्यापैकी सुमारे 27 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा या जिल्ह्याला लाभलेला आहे. या ठाणे जिल्ह्यात सागरी मासेमारी सोबतच भूजल मासेमारी देखील केली जाते. भूजल मासेमारीसाठी 7642 हेक्टर क्षेत्र ठाणे जिल्ह्यात अनुकूल आहे. मत्स्यविक्रीसाठी मुंबई सारखीच मोठी बाजारपेठ या ठाणे जिल्ह्यात उपलब्ध आहे. ठाणे जिल्ह्यातील मासे हे आखाती देशांमध्ये देखील निर्यात केले जातात.
ठाणे जिल्ह्यातील नद्या व धरणे- Rivers and Dams in Thane District
ठाणे जिल्ह्यात उल्हास नदी, वैतरणा नदी, तानसा नदी आणि दहिसर नदी या प्रमुख नद्या आहेत. या नद्यांवर बारवी धरण, मत्सरणा धरण, मध्य वैतरणा धरण, मोदक सागर आणि तानसा धरण देखील आहे.
ठाणे जिल्हा औद्योगिकीकरण - Industrialization of Thane District
औद्योगिक विकासाच्या दृष्टीने ठाणे जिल्ह्याचा राज्यामध्ये तिसरा क्रमांक लागतो. ठाणे जिल्ह्यातील 50% हुन अधिक भाग हा औद्योगिकीकरणामुळे आर्थिक व सामाजिक दृष्ट्या विकसित झालेला आहे. ठाणे जिल्ह्यात नोंदणी झालेले उद्योग हे प्रामुख्याने रसायने व औषधांशी निगडित आहेत. याशिवाय प्लास्टिक वस्तू, लोखंडी साहित्य आणि पॉवरलूम कापड यांची निर्मिती करणारे काही मध्यम व छोट्या स्वरूपाचे उद्योग देखील आहेत. केंद्रशासनाकडून परवानगी असलेले दारुगोळा आणि शस्त्र निर्मितीचा कारखाना अंबरनाथ येथे आहे.
ठाणे जिल्ह्यात खनिज उत्पादन फारसे नसले तरी देखील बांधकामासाठी रेती काढण्याचा व्यवसाय हा मुंब्रा, ठाणे, घोडबंदर या परिसरात मोठ्या प्रमाणावर चालतो.
18 एप्रिल इ स 1853 रोजी भारतातील पहिली प्रवासी रेल्वेगाडी बोरीबंदर म्हणजेच आत्ताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते ठाणे अशी 34 किलोमीटर धावली होती. साहिब, सिंध आणि सुलतान अशी नावे असलेल्या तीन वाफेच्या इंजिनांनी त्या गाडीला खेचले होते.
ठाणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळे - Tourist Places in Thane District
माळशेज घाट:
कल्याण अहमदनगर रस्त्यावर माळशेज घाट म्हणजे सध्याच्या घडीला पावसाळी पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेले परंतु लवकरच माथेरान आणि महाबळेश्वर सारखे बारमाही थंड हवेचे ठिकाण म्हणून विकसित होत असलेले ठिकाण आहे. पावसाळ्यात दाट धुक्याची शाल पांघरलेला हा डोंगरदऱ्यांचा परिसर पर्यटकांना वेड लावतो.
ठाणे जिल्ह्यातील धार्मिक स्थळे- Temples in Thane District
सिद्धिविनायक महागणपती मंदिर, टिटवाळा:
कल्याण कसारा मार्गावर काळू नदीच्या काठावर असलेल्या टिटवाळा येथे श्री महागणपतीचे जागृत मंदिर आहे. चिमाजीआप्पा यांनी वसई येथे पोर्तुगीजांवर विजय मिळविल्यानंतर श्री महागणपती मंदिर बांधले. महागणपती मंदिर आणि विठ्ठल रुख्मिणी मंदिर यामुळे या ठिकाणाला महात्म्य प्राप्त झाले आहे. टिटवाळा येथी गणपती मंदिर हे महाराष्ट्रातील 8 प्रसिद्ध गणपती मंदिरांपैकी एक आहे. श्री महागणपतीस "विवाहविनायक" देखील म्हटले जाते.
शिवमंदिर, अंबरनाथ:
इ स 1060 साली चित्राराजा यांनी या मंदिराची स्थापना केली. अंबरनाथचे ऐतिहासिक शिवमंदिर हे संपूर्ण भारतवर्षातील पहिले भूमिज मंदिर आहे. हे मंदिर कलात्मकता शिल्पवैभव आणि स्थापत्यशास्त्राचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. अंबरनाथच्या या प्राचीन शिवमंदिराचा समावेश युनेस्कोने जाहीर केलेल्या 218 कलासंपन्न वास्तूत देखील झाला आहे. हे मंदिर पूर्ण दगडांनी कोरलेले असून मंदिराची जमीन ही वाघाच्या कातडीपासून कोरलेली आहे असे म्हटले जाते. अंबरनाथ हे नाव येथील शिवमंदिरामुळेच प्रसिद्ध झाले आहे.
श्री क्षेत्र वज्रेश्वरी:
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी हे गाव गरम पाण्याच्या आरोग्यवर्धक कुंडामुळे प्रसिद्ध आहे. याशिवाय इथे चिमाजी अप्पांनी बांधलेले वज्रेश्वरी देवीचे मंदिरही प्रसिद्ध आहे. हे ठिकाण तानसा नदीच्या काठी वसलेले असून येथे नित्यानंद महाराजांची समाधी देखील आहे. येथील पर्यटकांचे मुख्य आकर्षण म्हणजे अकलोली आणि गणेशपुरी मधील गरम पाण्याचे झरे आहे. या झऱ्यातून औषधी गुणधर्म असलेले गरम पाणी वाहते असे मानले जाते.
ठाणे जिल्ह्यातील किल्ले - Forts in Thane District
हाजी मलंगगड:
ठाणे जिल्ह्यातील कल्याणच्या दक्षिणेस सुमारे 15 किलोमीटर अंतरावर मलंगगड किल्ला आहे. मलंगगड हे धार्मिक स्थान आहे. श्री मलंग म्हणजेच हाजी मलंग या नावाने याला ओळखले जाते. मलंगगड या किल्ल्याची बांधणी शिलाहार राजाने केली. गडावर मच्छिंद्रनाथांचे प्राचीन मंदिर व हाजी मलंग यांचा दर्गा देखील आहे. या दर्ग्याच्या पूजेचा मान हा आजही हिंदुकडे आहे. माघ पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते.
घोडबंदर किला
वसई किल्ला
गोरखगड किल्ला
माहुली किला
सुधागड किल्ला
ठाणे जिल्ह्यातील इतर महत्वाची ठिकाणे-
दादोजी कोंडदेव स्टेडियम, डॉ काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, संजय गांधी नॅशनल पार्क, पाली तलाव, उपवन तलाव, एलव्हीस बटरफ्लाय गार्डन आणि फ्लेमिंगो सेंच्युरी ही देखील पर्यटन स्थळे आहेत.