प्रतिपश्चंद्र - मराठी पुस्तक परीक्षण ।। Pratipaschandra - Marathi Book Review

प्रतिपश्चंद्र - मराठी पुस्तक परीक्षण ।। Pratipaschandra - Marathi Book Review

प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता 

शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।

छत्रपती शिवाजी महाराजांची ही राजमुद्रा आपल्याला असे सांगते की प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी आणि जगाला वंदनीय असणारी अशी ही शहाजी पुत्र शिवाजी यांची राजमुद्रा प्रजेच्या कल्याणासाठी विराजमान होते. याच राजमुद्रेत लपलेले एक रहस्य उलगडत नेणारी एक कादंबरी म्हणजेच डॉ प्रकाश सूर्यकांत कोयाडे लिखित प्रतिपश्चंद्र ही कादंबरी होय!

प्रतिपश्चंद्र - मराठी पुस्तक परीक्षण ।। Pratipaschandra - Marathi Book Review

इतिहासातील काही खऱ्या घटनांचा आधार घेऊन रोमांचक काल्पनिक कथानक असलेल्या कादंबऱ्या सध्या खूप चर्चेत आहेत. याच श्रेणीत शोध, विश्वस्त, भारताचे रहस्य या कादंबऱ्या देखील आहेत.यासारखीच छत्रपती शिवाजी महाराज आणि विजयनगरच्या इतिहासावर लिहिलेली रहस्यमय कथानक असलेली कादंबरी म्हणजे प्रतिपश्चंद्र होय. आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण याच प्रसिद्ध प्रतिपश्चंद्र कादंबरीचे पुस्तक परीक्षण करणार आहोत. 

पुस्तकाचे नाव - प्रतिपश्चंद्र

लेखकाचे नाव - डॉ प्रकाश सूर्यकांत कोयाडे

प्रतिपश्चंद्र पुस्तक रिव्ह्यू 

प्रतिपश्चंद्र ही कादंबरी 2018 साली प्रकाशित झाली. आजतागायत या कादंबरीच्या एकूण 11 आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. ही कादंबरी म्हणजेच हंपी, विजयनगर इथल्या खजिन्याच्या आणि सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण सिंहासनाच्या शोधाची कथा आहे. कथा आपल्याला शेवट पर्यंत खिळवून ठेवते.  

15 व्या शतकात विजयनगर हे खुप सामर्थ्यशाली राज्य होत. विजयनगरच्या राजधानीचे शहर असणारे हंपी म्हणजे सर्वात संपन्न शहर होते. हंपी मध्ये इतकी श्रीमंती होती की बाजारात भाजीपाला विक्रीला ठेवल्याप्रमाणे सोनं तिथे विक्रीला ठेवले जात असे. या संपन्नतेमुळे इतर सत्ता विजयनगरवर नजर ठेवून होत्या. यात बहमनी सत्ता देखील होती.

राजा कृष्णदेवराय नंतर विजयनगर साम्राज्यात एखादा वीर राजा बनला नाही.  प्रत्येक राज्याला त्यांच्या राज्यातील अमाप संपत्ती लुटली जाते की काय याची भीती वाटू लागली.  त्यामुळे हंपीच्या राजाने आपल्या राज्यातील सर्व संपत्ती एकत्र केली. ती संपत्ती इतकी जास्त होती की जवळपास 1600 हत्ती ती संपत्ती वाहून नेण्यासाठी लागले.  विजयनगरच्या राजाने तो खजिना एका वाड्याच्या खाली भुयारात लपवला. त्यानंतर काही काळातच विजयनगरच्या सत्तेचा ऱ्हास झाला. 

पुढे 17 व्या शतकात छत्रपति शिवाजी महाराज कर्नाटक स्वारीवर गेले होते. तिकडून परतत असताना चिदंबरम येथे महाराजांना विजयनगरचे राजगुरू भेटतात. ते शिवाजी महाराजांना खजिन्याची रहस्य सांगतात. आणि शेवटी तो खजिना महाराजांना अर्पण करतात. महाराज तो खजिना न घेता त्याच्या रक्षणाची जबाबदारी घेतात. 

शिवाजी महाराजांच्या आदेशावरून बहिर्जी नाईक त्या गुप्त खजिन्याची रक्षणाची योजना बनवतात. त्यासाठी ते 8 शिलेदार निवडतात. या 8 शिलेदारांकडे खजिन्याजवळ पोहोचण्याचा एक एक संकेत होता. हेच शिलेदार पुढे पिढ्यानपिढ्या कायम त्या खजिन्याचे रक्षण करतात. 

ज्या प्रकारे खजिन्याचे रक्षक होते त्याच प्रमाणे पिढ्यानपिढ्या त्या खजिन्याचा शोध घेणारे लोक देखील होते. त्यातच या कादंबरीचा नायक डॉ रवीकुमार एका न्यायाधीशाच्या खुनाच्या आरोपात अडकतो. त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्नात तो त्यात आणखी अडकत जातो. वेगवेगळे संकेत घेत, रहस्य सोडवत ते खजिन्यापर्यंत पोहोचवतात. या प्रवासात कित्येक रहस्य उलगडत जातात. 

खजिना नेमकं काय आहे?, खजिना नेमकं कुठे असतो?, सुवर्ण सिंहासन सापडते का?, कैलास मंदिर आणि इतर लेण्या कशा कोरण्यात आल्या? या आणि अशाच अनेक इतर प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी तुम्हाला कादंबरी वाचावी लागेल. 

रहस्य उलगडत अनपेक्षितपणे धक्के देणे हे कोणत्याही रहस्यकथेचे मुख्य केंद्र असते. त्यामध्ये ही प्रतिपश्चंद्र कादंबरी पुरेपूर उतरते. या कादंबरीमधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या कादंबरीत प्रत्येक ठिकाणी रहस्य दडलेले आहे. कादंबरी वाचत असताना काहीतरी भारी वाचतोय असाच फिल येतो. लेखकांनी स्वतःचे मत आणि विचार त्या पात्रांच्या तोंडून सांगितलेले आहे. 

आस्तिक नास्तिक म्हणजे काय? जिवंत असणे आणि जीवन जगणे यातील फरक काय? पाऊस आणि पृथ्वी यांचा माणसाशी असलेला संबंध यासारख्या विषयावर लेखकाने गोष्टीतून सांगितलेले मत आपल्याला भावते. कादंबरीत अशी अनेक वाक्ये आहेत जे तुम्हाला अंडरलाईन करून ठेवावीत असे वाटतील. 

कादंबरीच्या सुरुवातीची प्रकरणे आम्हाला चांगली आवडली. जिथं पासून खजिन्याचा शोध सुरू होतो तिथून मग सर्व काही फिल्मी वाटायला लागते. ज्या वाचकांना सस्पेन्स आणि थ्रिलर वाचायला आवडत त्यांना ही कादंबरी नक्कीच आवडेल. 

दीपस्तंभ तुम्हाला नक्कीच ही कादंबरी वाचायचा सल्ला देते. पुस्तकाचा शेवट तुम्हाला नक्कीच आवडेल. 


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने